Friday, October 16, 2009

हातात हात

[आज खूप लिहायचंय. आज खूप बोलायचंय. आणि आजच साले शब्द हरवलेत.]

पहाट झाली. डोळे किलकिले करून बघितले तर सगळा प्रदेशच नवा. कुठली तरी भैताड वेळ, कुठली तरी भैताड जागा. खूप वर्षांपूर्वी आमचा वाडा होता. अगदी पुण्याच्या हृदयात. घरात चिकार माणसं होती. आजी, आजोबा, चुलत आजी, चुलत आजोबा, आत्या, आमची सगळी मांजरं, एक छोटंसं कासव सुद्धा! वाडा पण झकास होता अगदी. एकदम गोष्टीतल्या सारखा. मोठ्ठं अंगण होतं, आंबा, फणस, रातराणी ची झाडं होती, आणि संडास ला जायचा एक जाम भीतीदायक रस्ता पण होता. अशा वाड्यात आमची कधीतरी मस्त मैफल जमायची. सगळे आजी आजोबा, आत्या, आई, बाबा, मी असे दुपारचं जेवण उरकून अंगणात पत्ते खेळायला बसायचो. जेवणाचा बेत पण कसा? आबांच्या हातच्या फुफाट्यात भाजलेल्या वांग्याचं भरीत मला अज्जून आठवतं. पत्ते खेळतांना मला नेहमी लहान म्हणून फक्त पत्ते टाकायचं काम मिळायचं. तेव्हा मला फार राग यायचा. ३०४ खेळतांना भंगार डाव आला की आबा नेहमी चिटींग करून सगळे पत्ते उपडे करून डाव "ओम्‌ फस्‌" करायचे. उगच चिडी खेळण्यात तर आमच्या घरचे पटाईत! कोण जिंकायचं कोण हरायचं वगैरे मला आता काही आठवत नाही. ह्या सगळ्या गोष्टींना चिकार वर्षं झाली. मध्यंतरी देव म्हटला, मला पण तुमच्यात खेळायला घ्या, आणि त्याने आमच्यातले बरेच हात ओढून घेतले. आता तो वाडाही गेला, संध्याकाळी अंगणात बसून स्वत:च्या हाताने गरम गरम वरण-भात भरवणारी आजीही गेली. माझ्यासाठी रोज न चुकता चिंच गुळाची आमटी करणारी चुलत आजीही गेली.

कधीतरी चांदण्या रात्री लाईट गेले की आईच्या मांडीवर डोकं ठेवून अंगणात रेडीयोवर गाणी ऐकायला किती अवीट मजा यायची! अगदी परवाच आई म्हणाली - खूप पैसे कमवून एखादा सुंदर वाडा विकत घेईन असा का नाही रे म्हणत तुम्ही?

हातात हात...

****

परवा राहुल ने पिंग केलं आणि म्हटला: "तुला सांगितलं का रे मी?" त्याला तिथल्या तिथे थांबवून म्हटलं - मित्रा, ह्यापुढे कधी चुकून सुध्दा वाक्याची सुरुवात अशी करू नकोस. हल्ली असल्या सगळ्या वाक्यांचा शेवट "माझं लग्न ठरलंय" ने होतो.

श्रावणातल्या दर रविवारी कशी आदित्य-राणूबाईची तीच तीच कहाणी परत परत सांगायची असते ना, तशीच एक ओरिजनल [उच्चारी "व्हर्जिनल"] कहाणी आमच्या कडे पण आहे. ह्या कहाणीची अगदी मागच्याच महिन्यात पुन:प्रचिती आली. जमलेल्या शंभर तरूणींमधली नेमकी आपल्याला मनापासून आवडलेलीच कशी काय "कमिटेड" निघते? एका उत्तराची कहाणी उलट सतराशे साठ प्रश्न घेऊन नेहमीच कशी निष्फळ आणि अपूर्ण राहते?

हातात हात, पिवळे हात...

*****

कोवळ्या थंडीत, चहाचा गरम्म कप दोन्ही हातात घट्ट धरून मारलेल्या गप्पा, "स्वीकार"ला "और एक कप" करत घालवलेल्या संध्याकाळी आता माझ्या आयुष्यात अजरामर झाल्या आहेत. पहाटे ११ वाजता मक्याला उठवलं की निमूट पणे डोळे चोळत MT ला चहा प्यायला यायचा. अन्‌ मग "दो इस्पेसल" ची ऑर्डर देऊन पुढचे दोन तास जगातल्या यच्चयावत गोष्टींवर चर्चा व्हायच्या. त्यात अगदी अश्लीलतम विनोदांपासून महाडोकेबाज कोट्यांपर्यंत सर्व वाङ्‌मय प्रकारांचा समावेश असायचा. एकदा मक्या म्हटला चहा जरा बोअर झालाय, आज उसाचा रस पिऊ. उसाचा रस सांगितला, तर २ मिनिटांत तयार झाला आणि पुढच्या १ मिनिटात पोटातही गेला. काय मजाच नाय. चहा सांगितला की तो यायलाच कसा अर्धा तास लागायचा. कारण "इस्पेसल" पिणारे फक्त आम्हीच. मग "राजकुमार"ला आमच्या साठी वेगळं आधण टाकायला लागायचं. मग कधीतरी तो चहा उगवणार, आणि मग शेवटी तो चहा आम्ही पिणार. तो एक लहानपणी प्रमोद नवलकरांचा धडा होता. "घंटा" नावाचा. त्यात त्यांना प्रश्न पडला होता की घंटा हा आपल्या जीवनाचा इतका अविभाज्य घटक असूनही अजून कोणी घंटेवर महाकाव्य कसं काय नाही लिहीलं? प्रमोदराव, पैजेवर सांगतो, घंटेआधी चहावर महाकाव्यं लिहीली जातील. कृष्णाने सुध्दा अर्जुनाला गीता सांगायच्या आधी सुमडीत "दो इस्पेसल" ची ऑर्डर दिली असणार, आणि मग निवांत पणे दोन हातात चहा चा गरम्म कप घट्ट धरून गीता-बिता सांगितली असणार. नक्कीच.

आता मात्र ते मैत्रीचे हातही कुठेतरी दूर राहिले...

*****

यमन रागातलं एक खूप गोड गाणं ऐकत बसलोय. आज खूपच थंडी आहे. त्यात पुन्हा पाऊस. बर्फही पडायचा कदाचित. काय सुरेख पेशकश आहे, दर कडव्यात षड्‌जाचं मृगजळ दाखवत गायिका कशी सगळ्या जगभर फिरवून आणतेय! आणि अगदी रहावेनसं झालं, की प्रत्येक कडव्याच्या शेवटी एक दीर्घ षड्‌ज येतोय...

हाताशी हात जोडून पुढच्या षड्‌जाची अत्यंत आतुरतेने वाट पहात हातांवरच्या चिरस्थायी रेषांचं कोडं सोडवत बसलोय.

हा यमन आहे. मारवा नाही. तो षड्‌ज येणारच.

Thursday, September 17, 2009

किती गणितं सोडवतोस दिवसाला?

"ऐला! म्हणजे तुम्हाला परिक्षेत फक्त गणितं सोडवायची असतात?" दुपारी २ च्या अत्यंत शुभसूचक वेळी अमृताचा (निळी टोपी वाले ह्याला "चहा" म्हणतात) चषक हाती असताना, एका बेसावध क्षणी, एकीने मला फुलटॉस वर क्लीन बोल्ड केला. लोकहो, थांबा. हा प्रश्न वरवर जितका हास्यास्पद दिसतो, तितका बावळट मुळीच नाही. ह्याच्या मुळाशी गणित ह्या विषयाबद्दल समाजात असलेलं अज्ञान दडलेलं आहे. पोरगं गणितात PhD करतंय म्हटल्यावर लोक अक्षरश: चेकाळतात, आणि असे काही प्रश्न विचारतात, की विचारता सोय नाही! यंदाच्या सुट्टीत तर लोकांनी कहर केला. "काय मग, किती गणितं सोडवतोस दिवसाला?" अभियांत्रिकीच्या तृतीय वर्षाला असलेली एक कन्या. "अख्खी पी. एच. डी भर तुम्हाला एकच गणित असतं का रे? शी किती बोअर!". "वा वा... म्हणजे कानडे’ज्‌ थियरम येणार आता पाचवी च्या पुस्तकात!" ही त्यातलीच काही सालस वाक्य. दुकानात गेलं, की "अरे हा ठेवील की हिशेब, गणितात आहे लेकाचा". भले! गेले पाच वर्ष मी एकही "मोठी बेरीज-वजाबाकी-गुणाकार-भागाकार" केलेली नाही ह्यावर विश्वासच बसत नाही लोकांचा. जरा शिकले सवरलेले, (विशेषत: JEE वगैरे साठी "Prepare" करणारे) तर अज्जूनही मला टॅनॉफ्कॉटॉफेक्स चं integral करून देतोस का वगैरे विचारतात. "तुझा फेवरेट नंबर कुठला रे?" ह्या ही प्रश्नाला मी सामोरा गेलोय. अहो हे तर काहीच नाहीये. "तुला हे सगळे थियरम्स खरे वाटतात का रे? मला की नै फक्त १०वी पर्यंतचेच खरे वाटतात बाई." आता बोला. है कोई जवाब? पण उपरोक्त सर्व जनता ही त्यांच्या त्यांच्या क्षेत्रात सरस असल्याने मी हे सगळं हसण्यावारी नेलं. मात्र एकदा मुंबई हून लखनऊ ला जाताना, आमच्या समोर बसलं होतं एक पात्र. ३० वर्षांचा घोडा झाला तरी साईड-अप्पर ही सामान ठेवण्याची जागा नसून झोपायची जागा आहे ह्याचं त्याला ज्ञान नसावं. (कारण त्याने तसं आम्हाला विचारलं देखील!) कोण कुठला करता करता मी त्याला सांगितलं गणित शिकतोय म्हणून. तर म्हणे बारावीला Integration होतं का तुम्हाला? म्हटलं हो. तर म्हणे, "मग आता काय राहिलय शिकायचं गणितात?" मी बदाबद तोंडाला येतील ते शब्द टाकले, मग चूप बसला.

तर अशी सगळी मजा. गणिताचं एक सोडा. पण कुठल्याही विषयात PhD करणं हाच एक खूप मोठा संशोधनाचा विषय ठरावा. आत्ता आमच्या पदवीदान समारंभाच्या वेळी एका केमिस्ट्री वाल्या बाबाने १३ शब्दी नावाच्या कंपाऊंड वर PhD केल्याचं आम्हास आढळलं. PhD वाल्या लोकांमध्ये ह्या महाभागाला सर्वाधिक टाळ्या पडल्या! त्याने पहिला महिना फक्त ते नाव पाठ करण्यात घालवला अशीही वदंता होती. लोक कशावरही PhD करतात. २००३-०४ मध्ये "सामना" मध्ये जे दैनिक राशीभविष्य यायचं[१] त्यानंतर सगळ्यात विनोदी म्हणजे सकाळ मध्ये येणारं "पी. एच. डी. चे मानकरी" हे सदर होय. प्रबंधाचं शीर्षक ४ ओळींपेक्षा कमी असेल तर देतच नाहीत वाटतं PhD. विषय पण महान. "हवाई बेटांवरील साहित्यावर हिंदू संस्कृतीचा प्रभाव" वर गडचिरोली विद्यापीठातून हवाई बेटांवर पाऊलही न ठेवता PhD.[२] आऽवराऽ! पण ज्यूरीतील सभ्य गृहस्थहो, विषय काहीही असला, तरी PhD ही PhD असते. तुमच्यासारख्या पैशाच्या मागे पिसाट सुटलेल्या भोगवादी, चंगळवादी संस्कृतीला नाही समजायचं ते.[३]

तर मुद्दा असा, की ५ वर्ष डोकेफोड करूनही हाती काय लागेल ह्याची शाश्चती नाही.
म्हणून आम्ही आधीच "PhD जमली नाही तर काय?" ह्या प्रश्नाचा विचार करायला सुरूवात केली आहे. महाराष्ट्र बोर्डाची सद्य:स्थिती बघता ५ वर्षांनी आम्ही प्रस्तुत लेखात निर्दीष्ट एकमेव कल्पनाचित्राप्रमाणे "गणिते सोडवून देण्याचा" धंदा सुरू करण्याच्या इराद्यात आहोत. तरीपण ४-५ (खडतर) वर्षांनंतर असा कुठला फलक शनिवार-सदाशिव मध्ये आढळला तर चमकू नका. आणि हो... एक राहीलंच. त्यावेळी ह्या लेखाचं कात्रण घेऊन येणारास खरे एक आणि जीवनाचे एक अशी दोन गणिते मोफत सोडवून देवू!
---
[१]. "आज पडदे बदलावेसे वाटतील." अरे?!
कळस - "आज कान कोरू नका." अहो, हे तर भविष्यही नाहीये!!!
[२]. नावं खरोखरंच बदलली आहेत.
[३]. इथे येऊन बघा. फुकट खाणं दिसलं की "Grad Students" कसे फॅमिली सकट येऊन बसतात ते. [४]
[४]. PhD करताना तळटीपा लिहीण्याचा सराव हवा म्हणे. म्हणून हा खटाटोप.

Friday, July 03, 2009

अरे हाड!

खो-खो हा खेळ मोठाच मस्तान. बघायला अत्यंत रोमांचक आणि खेळायला तितकाच अवघड. झनाट वेगाने सुरू असलेला अटॅक, चतुराईने दिलेल्या झुकांड्या, निडरपणे दोन दोन पाट्या मारलेल्या दिलखेचक डाईव्ज, हुशारीने पोल वर खेचलेले गडी, सटासट मारलेले पोल, सुसाट केलेले रश, तर कधी संथ गतीने बचाव करून "पाडलेला" अटॅक, बाहेरून जोशात केलेलं चियरींग, गडी मारल्यावर माजात केलेलं अपील, शड्डू ठोकून दिलेल्या खुनशी आणि अश्याच रोमांच आणणा-या कितीतरी गोष्टी.

खो-खो चं नाव जरी काढलं तरी माझ्या मनात कितीतरी आठवणी जाग्या होतात. डाईव्ह टाकली की माझ्या कमरेला उजवीकडे नेहमी जखम व्हायची. असंच खूप दिवस होऊन होऊन ती जखम जाम चिडकी झाली होती. जखम भरायच्या आतच परत फुटायची. त्या दिवशी अशीच प्रॅक्टीस चालू होती. आमचा आधी अटॅक होता. आमच्या टीमच्या फर्स्ट बॅचचा गडी बॅटींग करत होता. (क्रिकेट मधे बॅटींग = बचाव, हीच संज्ञा खो-खो मध्ये जशीच्या तशी उचललेली आहे.) आणि उरलेले आम्ही सगळे अटॅकला होतो. चतुरपणे त्याने आमचा पूर्ण अटॅक झोपवला होता. २ मिनिटं झाली, ३ झाली, आऊटच होईना. पोल मारावा तर हात भर लांबून पोल सोडायचा, अक्शन खो बरोबर स्पॉट करायचा. ४ मिनिटं झाली तरी कोणाच्या हातीच येईना. साधारणपणे पळणारा दमला की तो ट्रॅक वर पळणं सोडून चारच ऍटॅकर्सना घेऊन खेळतो, जेणेकरून दम-श्वास परत मिळवता येतो. आता त्याने असं चौघातलं खेळायला सुरूवात केली. जखमेमुळे मी आधीपासूनच डाईव्ह मारायला कचरत होतो. पण आता अती झालं. दैवयोगाने एकदा त्याने मला चौघात घेतलं. माझं चार पावलं "कव्हर" झाल्यावर त्यानं झटकन झुकांडी दिली अन्‌ तो आत गेला. तो अगदी जस्ट माझ्या टप्प्यात होता. मागून "शंक्या उड" असं कोणीतरी म्हणायच्या आतंच माझं रक्त कमरेच्या जखमेतून मेंदूत चढलं होतं, दिसत होते ते पळणा-याचे खांदे, अन्‌ कुठलाही विचार न करता पुढच्याच क्षणाला मी हवेत दोन फूट जमिनीला समांतर उडालेलो होतो. खेचलेले हात पळणा-याचा कमरेला लागले, मी जमिनीवर पडलो. मागून "मारलाय, मारलाय" च्या आरोळ्या उठत होत्या. शिट्टी वाजली.

जखमेवरचा कापूस निघून परत एकदा कंबर रक्ताळली होती. एकवार झोंबणा-या जखमेकडे बघून आपसूकच उद्गार निघाले: "अरे हाड!".

*****

You Can Win.

Monk Who Sold His Ferrari.

Self - Help books.

२१ अपेक्षित.

यशाची गुरुकिल्ली.

अरे हाड!

*****

हळूहळू उन्हाळा सुरू होत होता. गरम्म्म दुपारी, गरम्म्म वा-यात, गरम्म्म उन्हात जीव हैराण होवून जाई. ज्या बातम्यांसाठी कान तरसले होते, त्या तर दूरच राहिल्या, पण जे नको तेच भाग्यात येत होतं. अशा अवघड वेळी मला आधार दिला तो अमलतासाच्या सोन-बहराने लवडलेल्या झाडांनी. माजुरड्या उन्हाच्या थोबाडावर थुंकून त्याच्यापेक्षाही सरस रंगात रंगणा-या अमलतासाला मानला आपण. इतक्या उकाड्यातही भान हरपावं असा त्याचा पिवळा धोम रंग. पण अमलतास अन्‌ गुलमोहराची बातच और. रोज संध्याकाळी शेवटी कंटाळून सूर्य घरी धूम ठोकत असे, उद्या परत येईन तुझी जिरवायला म्हणून. अमलतास, लेका तू खरा तरूण आहेस. अरे कसल्या अडचणी आणि कसली संकटं रे? एकदा सणसणीत "अरे हाड" म्हणण्याची धमक शिकावी ती तुझ्याकडून. अन्‌ रात्रभर खिंडीत २०-२५ सरदारांनिशी हजारोंच्या सेनेला थोपवून धरणा-या टोळीला तांबडं फुटताच नव्या दमाची कुमक मिळावी तसे ते पावसाळी ढग येतातच की मग काही महिन्यांनी तुझ्या मदतीला! तोवर त्या सूर्याची मस्ती पूर्ण जिरलेली असते, आणि राखाडी आकाशाच्या दरबारी एकटा तूच विजेता असतोस. अमलतास, लेका तूच खरा गुरू आहेस.

Wednesday, April 22, 2009

धृवपद


चमचमत्या अंशुलांचा अंगरखा पांघरलेल्या त्या थेंबाने उंच आकाशातून गंगेप्रति झेप घेतली होती. काही तपांपूर्वीचा त्याचा जन्मदिवस त्याला आठवत होता...

... ग्रीष्मातील तप्त मध्याह्नीनंतर सगळे नगरजन गंगेच्या संध्याऽरतीसाठी तीरावर जमले होते. फुलांच्या विविध रंगांनी, धूपांच्या वासानी, घंटांच्या शुभसूचक नादांनी आणि दिवसभराच्या रोमहर्षक गोष्टी गंगामाईला सांगायला आलेल्या पक्ष्यांनी वाळवंट कसं संजीवित झालं होतं! यथावकाश आरती उरकली आणि सर्वांनी आपापल्या पणत्या पात्रात सोडल्या. सगळ्या गजबजाटापासून किंचित दूर एका युवकाने त्याच्या गुरुला साष्टांग नमस्कार केला आणि त्यांची पायधूळ भाळी लावली. आजचा दिवस अत्यंत पवित्र होता. आज त्या युवकाचं शिक्षण पूर्ण झालं होतं. यापुढे तो अनेक वर्ष स्वत:च्या भारदस्त गायनाने देशोदेशींच्या रसिकांना मुग्ध करणार होता. संथ वाहत चाललेल्या गंगेतील दीप्तीमान दिव्यांना डोळ्यात साठवत त्यानं षड्जाचं अधिष्ठान घातलं. निमिषार्धातंच त्याच्या नेत्रातून निखळलेल्या अश्रूच्या त्या थेंबात तिथलं सारं दृश्य उमटलं. आजूबाजूला जमू लागलेल्या गर्द काळोखात जान्हवीच्या गौरवर्णावर पणत्यांचे सुवर्णालंकार किती मोहक दिसत होते! जन्मत:च त्या थेंबाची एका सुंदर सत्याशी ओळख झाली होती, आणि इतक्या शुभमुहूर्तावर जन्मलेल्याची ध्येयपूर्ती न झाली तरंच नवल!

...मध्यंतरी कितीक वर्षे लोटली. आता वृद्धत्वाकडे झुकलेला तो युवक नावाने, मानाने खूप मोठा झाला होता. त्याने विद्येची पूजा कधीच केली नाही. त्यानं पूजलं ते स्वत:ला. देवानं जशी स्वत:च्या आनंदासाठी सृष्टी रचली, तशीच त्या युवकाने स्वत:ची स्वरांगी दुनिया बनविली. त्या थेंबाचाही प्रवास चालूच होता. कधी मातीच्या कणांतून, कधी वा-याबरोबर, कधी ढगांतून, कधी पक्ष्यांच्या रंगीत पंखांवरून. सृष्टीची इतकी अनेकविध रुपे बघूनही त्याला त्याच्या प्रियेचा अद्याप विसर पडला नव्हता...

... अन्‌ आज इतक्या वर्षांनंतर त्या तिघांची परत भेट होत होती. एक शीतल पहाट येऊ घातली होती. वा-य़ाच्या प्रत्येक झुळूकेबरोबर थेंबावर हर्षोल्हासाचे तरंग फुटत होते. अलकनंदेचाच शुभ्र रंग ल्यालेल्या त्या वाळूत आताशा थकलेल्या त्या युवकाने भैरवाचे कोमल स्वर लावले होते. सूर कोमल असले, तरी धृपद आवेशपूर्ण होतं. त्या बोलांमध्ये जरी जगन्नियंत्याच्या श्रेष्ठ तेजाची महती वर्णिलेली असली तरीही ते धृपद म्हणजे स्वत:च्या देदिप्यमान कारकिर्दीची विनम्र भावाने सांगितलेली कथा होती. वयानुसार जरी लयीत जबरदस्त संयम आलेला असला तरी ते धृपद तरुण होतं, त्याला नाविन्याची आस होती. पखावजाच्या प्रत्येक जोरकस थापेसरशी कित्येक नवजात खगांना पंख फुटत होते, अन्‌ धा दिं ता किट तक गदि गन च्या ठेक्यावर कितीक गर्द वृक्षांची नवी पालवी नाचत होती. रेखीव घाटदार वळणांच्या अलकनंदेचं हेमांगी सौंदर्य त्या थेंबात उमटत होतं. संथ गतीनं अवतीर्ण होणा-या आरक्त सूर्यकन्येला अंगाखांद्यावर खेळवणारी जान्हवी कोण मोहक दिसत होती! जाणा-या प्रत्येक क्षणामागे गंगेचे अंतरंग अधिकच खुलू लागले होते. एकाच स्पर्शासवे त्याच्या प्रियेच्या सुकुमार गालांवर उमटणा-या तरल जलतरंगांचं त्याचं स्वप्न आता केवळ दोनच क्षण लांब होतं... ... किट तक गदि गन धा.

[आधारीत: स्थितप्रज्ञ तळ्याच्या प्रेमात पडलेल्या नदीची मूळ कल्पना संपदाची]

Thursday, January 22, 2009

Crazy Ideas (4)
चालीत चाल, पराग चाल – ऊर्फ ब्राऊनची चाल

आमच्या डिपार्टमेंटातल्या मास्तर आणि मास्तरीणबाईंना शिकवायला अमेरिकेहून नुकतेच एक गांगुली नावाचे प्रोफेसर आले होते. आणि झालं असं की ते भारतीय शास्त्रीय संगीताचे नुसते शौकीनच नाही तर उत्तम गायकही निघाले. त्यांच्या अल्प परिचयासकट कार्यक्रमाचं एक आमंत्रण सर्वांना गेलेलं होतच. त्यातूनच त्याचे बरेचसे गुरू मराठी असल्याचं कळलं. मनोमन खूप छान वाटलं. कार्यक्रम सुरू झाला, खड्या आवाजात त्यांनी गौरी-भैरव व सावनी-केदार पेश केला. नंतर कुठल्याश्या रागात एक विवादी कोमल गंधार त्यांनी घेतला आणि नंतर रसिकांना समजावून सांगताना म्हटले (इंग्रजीतून बरंका!) “बघा, ह्या रागाला कोणाची दृष्ट लागू नये म्हणून हा एक कोमल स्वर कसा खुबीने आला आहे ह्या बंदिशीमध्ये. ह्याला आम्ही मराठीत ‘गालबोट’ असं म्हणतो.” अर्थातच ही मराठी संज्ञा त्यांच्या गुरूजींनी त्यांना शिकविली असणार. नंतर त्यानी एक बंगाली भजन गायलं आणि हसून म्हणाले, “माझ्या आडनावाचा आदर ठेवून मी बंगाली भजन म्हटलंच पाहिजे होतं नाही का? मला बंगला येत नाही ह्यावर एकदा कोलकात्याच्या वंगबंधूनी मला धारेवर धरलं होतं!”. ह्यानंतर मात्र जे झालं त्यानं आमच्या आनंदाला पारावार उरला नाही. ते म्हणाले की ते मुंबईत वाढले आहेत, आणि अस्खलित मराठीत त्यांनी आम्हाला कुठला अभंग गाऊ असं विचारलं. आमची फर्माईश – “माझे माहेर पंढरी” ते अतिशय ताकदीनं गायले, आणि आमचे कान तृप्त झाले. काय गंमत आहे बघा - ते वाढले मुंबईत, कर्मभूमी अमेरिका, मी वाढलो पुण्यात, प्रोफेसरांशी भेट झाली अजूनच तिसरीकडे, कानपुरला; त्यांचं आडनाव अगदी आतून बाहेरून बंगाली, पण ते होते मात्र मराठी!

बरोबर तीनशे पासष्ट दिवसांपूर्वीची अश्शीच एक भेट आठवते मला. आमच्या डिपार्टमेंटाने तर्कशास्त्रावर एक आंतरराष्ट्रीय सभा भरवली होती आणि एका रात्री त्या सभेच्या सगळ्या लोकांचं एकत्र जेवण होतं. सभेच्या नियोजनामध्ये थोडाफार हातभार लावला म्हणून आमच्या मास्तरीणबाईंनी आम्हालाही जेवणाचं आमंत्रण धाडलं होतं. आमच्या इथले सगळे शिक्षक एकदम मस्त आहेत. त्यांच्याशी मस्त गप्पा चालू होत्या. सूप्स वगैरे चा अस्वाद घेत सगळीकडे गप्पाष्टकं रंगलेली होती. योगायोगाने, त्याच वेळेस एका वेगळ्याच विषयावर व्याख्यान द्यायला पोर्तुगालहून एक संशोधक आमच्या डिपार्टमेंटात आले होते. खरंतर ते ह्या सभेशी निगडीत नव्हते, पण डिपार्टमेंटाचे अतिथी म्हणून त्यांनाही जेवणाचं निमंत्रण होतं. माझ्या एका शिक्षकांनी माझी ह्या प्रोफेसरांशी ओळख करून दिली. प्रोफेसर त्यांच्या मुलीलाही बरोबर घेऊन आले होते - तिला भारत दाखवायला. सुरेख कुरळ्या केसांच्या त्या मुलीचं नाव आरीयान्नी. साधारण आमच्याच वयाची असेल ती. आरीयान्नी ही ग्रीक पुराणांमधली एक राजकन्या. प्रोफेसरांनी आम्हाला आरीयान्नीची पुराणातली गोष्ट सांगायला सुरूवात केली. प्रोफेसरांचं इंग्रजी थोडंसं कमकुवत असल्याने ते अगदी निवांतपणे, बरोबर शब्द हुडकत, ती गोष्ट सांगत होते, पण कुठेही कंटाळवाणं होऊ देत नव्हते. जिथे जिथे तिच्या बापाचा उल्लेख येई तिथे तिथे स्वत:ची त्याच्याशी तुलना करत “मी तसा नाही बरंका” वगैरे म्हणून आम्हाला हसवत होते. तर, मध्येच त्यांना गोष्टीचा कुठलासा भाग नीटसा आठवला नाही, म्हणून त्यांनी छोकरीकडे एक मदतीसाठी कटाक्ष टाकला. आता ख-या आरीयान्नीला इंग्रजी मुळीच येत नव्हतं. आणि गोष्टीतल्या आरीयान्नीला आता रडायचं होतं. म्हणून तीने आपल्या भावपूर्ण हातवा-यांसह प्रोफेसरांना तो भाग समजावून सांगितला आणि गोष्ट पुढे सुरू झाली. नंतर थोड्याफार गप्पा झाल्या. प्रोफेसर व आरीयान्नी काही दिवसांनी वाराणसीला जाणार होते. जेमतेम पंधरा-एक मिनिटांची आमची भेट, पण मला अजूनही ती संध्याकाळ आठवली की फार भारी वाटतं. ती मुलगी कुठेतरी सहस्र मैल दूर जन्मलेली, वाढलेली आणि निव्वळ योगायोगाने जगाच्या तिस-याच कोप-यात आमची केवळ काही मिनिटं झालेली भेट! दुस-या दिवशी सकाळी मला तिचा चेहरा मुळीसुद्धा आठवेना.

खोटं वाटेल, पण अश्या वेगवेगळ्या भन्नाट लोकांशी माझ्या अवचित आणि संस्मरणीय भेटी गेलं वर्षभर होतंच आहेत. कोण, कुठे, कधी भेटेल ह्याचा नेम नाही. ह्या आयुष्याच्या शेवटच्या क्षणी यम बोलवायला आला ना, की मी एक गम्मत करायची योजली आहे. यमाकडून थोडीशी “टँप्लीज” मी मागून घेणार आहे. पृथ्वीचा एक मोठा गोल आणून मी जसा जसा जगत गेलो तश्या तश्या त्यावर रेघोट्या ओढणार आहे. मग रेघोट्या ओढता ओढता मला तेव्हा अशाच कुठे-कुठे झालेल्या अनंत भेटी आठवतील. पाण्यात पडलेल्या मट्ट्ट्ठ पराग कणाची कशी धावपळ चालू असते की नाही, तसं दिसेल माझं जीवन मग मला…

इकडून तिकडे, तिकडून भलतीकडे… मध्येच येऊन धडकणारे असेच अनेक बेअक्कल परागकण… इकडून तिकडे हळूच, तिकडून भलतीकडे वेगात... इथे “हाय”, तिथे “बाय”, परत धडक, परत “हाय”… इकडून तिकडे, तिकडून आणिक भलतीकडे... बेअक्कल, बेअक्कल… मस्तंच!

Friday, November 28, 2008

मृत्यू

१४ सप्टेंबर २००८, इलाहाबाद

ह्या शहरात उतरलो, तेव्हापासून श्वास छातीतच अडकून राहिला होता जणू. एक गोष्ट मनासारखी होईना. बरोबर चुकीचा मुहूर्त निवडला होता आम्ही बहुतेक. हॉटेल मध्ये एका रात्रीसाठी रुम घेतली होती. रुम मिळाली खरी, पण ब-यापैकी अंधारी होती. एकच रात्र रहायचं होतं, आणि उगाच पैसे खर्च करण्यात अर्थ नव्हता म्हणून जी मिळाली ती घेतली. जेवायला बाहेर पडलो, तर एका टपरी वर ४० रुपयात अती भंगार जेवण मिळालं. नंतर कळलं पुढे अजून चांगल्या खाणावळी होत्या म्हणून. का कुणास ठाउक, पण कधी एकदा उद्याची परीक्षा संपवून निसटतोय असं झालं होतं मला. रात्री कायतरी उजळणी केली, आणि झोपलो. परीक्षेसाठी आधिच खूप तयारी केली होती त्यामुळे रात्री खूप शीण आला होता. एखाद्या नवीन भेटलेल्या व्यक्तिबद्दल उगाचच विचित्र वाटतं ना, तसं वाटायला लागलं होतं मला ह्या शहराबद्दल. सकाळी उठलो, थोडस काहीतरी जे मिळालं ते खाल्लं आणि परीक्षा जिथे होती तिथे जायला निघालो. रेल्वे स्टेशन ओलांडून दुस-या बाजूला जायचं होतं. थोडासा ताण आला होताच. सहाजिक आहे, परीक्षा तिथे ताण! आम्ही foot-over-bridge चढत होतो आणि वर पोहोचायच्या थोडं आधी काही माणसं दिसली. त्यातल्या एकाने दुस-याला काही कपडे आणायला सांगीतले. आम्ही वर पोहोचलो, आणि एका क्षणात मेंदूला झिणझिण्या आल्या. समोर एका भिका-याचा अतिशय भयानक अवस्थेतला मृतदेह पडला होता. सुजून फुगलेल्या चेह-यातून सुजलेले डोळे बाहेर आलेले, दातात अडकलेल्या सुजलेल्या जिभेतून बाहेर पडणारं थिजलेलं रक्तं. अतिशय कळकट्ट सर्वांग, रक्त आणि घाण यातला फरक न समजण्याइतकं. माश्याही जवळ जात नव्हत्या... त्या नरक-दृश्यापाशी देहाची विल्हेवाट लावायला जमलेले ४-५ लोक... दोन क्षणात माझी जणू दातखीळ बसली, पोटात किंचीत ढवळायला लागलं, शरीरातील रक्ताच्या प्रत्येक थेंबाचा हिशेब लागला... खूप कष्टाने परीक्षेवर परत लक्ष्य केंद्रित केलं आणि तिथून आम्ही पळ काढला... ३ तासांनी परीक्षा संपली. परत एकदा त्या ठिकाणावरून जाताना नाडी आधीच वाढली होती... मात्र आता सगळं जैसे थे होतं...

*****

८ नोव्हेंबर २००८, दिल्ली

नवीन शहर, नवीन परीक्षा. उघड्या डोळ्यांनी दिल्ली बघण्याची ही माझी पहिलीच वेळ. सकाळी पावणेबाराला परीक्षा संपली आणि पुढे पूर्ण दिवस मोकळा होता. नाहीतरी कानपुरला परतायला ७ तास लागतातच, मग आम्ही ठरवलं की पूर्ण वेळ दिल्लीत घालवून प्रवास रात्रीवर टाकूयात. परीक्षा संपताच हॉटेल मधून चेक-आऊट केलं आणि फिरायला बाहेर पडलो. आधी पराठ्यांचं भरपेट जेवण केलं. दिल्लीत सगळंच महाग वाटलं. अगदी फालतू गोष्टींवरही बरेच पैसे खर्च होत होते आमचे. दुपारी आम्ही कनॉट प्लेस ला आलो. प्रत्येक वळणावर, अक्षरश: प्रत्येक वळणावर बरीस्ता नाहीतर कॅफे कॉफी डे, झालंच तर पिझ्झा हट वगैरे दिसत होतं. अश्या ठिकाणी खिशातल्या हिरव्या नोटांचं काही मोलच उरत नाही. आम्ही खूप वेळ कनॉट प्लेस, पालिका बजार वगैरे च्या घिरट्या घातल्या. कदाचित धुकं आणि धुरामुळे असेल, पण त्या दिवशी वातावरण जरासं उदासच होतं. संध्याकाळ पडू घातली होती. आणि प्रत्येकाच्या खाण्याच्या आवडीनुसार आम्ही दहा-पाच दुकानं एव्हाना पालथी घातली होती. एकंदरीतच बरेच सुखवस्तू लोक, फिरंगी वगैरे जनता होती. तेव्हाच, शुभ्र कागदावर एकच काळा डाग असावा तशी ती भिकारीण आम्हाला दिसली. तिच्यासमोर एक मूल पालथं निपचीत पडलं होतं. मेलेलं असावं. त्या भिकारणीचा स्वत:वर ताबा नव्हता. तिला वेड लागलं असावं. त्या भयानक दृश्यात डोळे मिटून घेण्याचंही भान मला राहिलं नव्हतं...

*****

इतकी का रे अवघड तुझी भाषा, कर्मा?

Monday, November 10, 2008

अंधारलेल्या दिवाणखान्यात आजोबांच्या रेडियोवर "भय इथले" लागलं. शब्द कळत होते, पण अर्थ लागत नव्हता. नुसत्या सुरावटीनीच विचार सागरावर वादळं यायला लागली. दोन वर्ष झाली आज आपल्याला भेटून. गेल्या एका तपातील ही येवढी एकच भेट. पोत्यात बांधून वेशीवर सोडून आल्यावरही निगरगट्टपणे परत येणा-या लाडक्या मांजरीसारखी ती एक सोनेरी आठवण.

भय इथले संपत नाही, मग तुझी आठवण येते

मी संध्याकाळी गातो, तू मला शिकविली गीते...

हे झरे चंद्रसजणांचे, ही धरती भगवी माया,

झाडांशी निजलो आपण झाडांत पुन्हा उगवाया...

विश्वोत्पत्तीच्या वेळी आपले अणु-रेणू अगदी जवळ जवळ होते, ह्याचा मला आज कोण आनंद होतोय म्हणून सांगू! अजून कोट्यवधी वर्षांनी त्या भास्कराच्या पोटी आपली राखही एकत्रच असेल कदाचित. केवढी ही आशा, अन् केवढी ही उपेक्षा! सगळ्या शक्यता संपून जेव्हा फक्त आशा उरतात ना, तेव्हा संध्याकाळ झाली समज. ह्या सगळ्या आशा खरोखरच वांझ निघतील ह्याची अफाट भीती वाटते बघ!

तो बोल मंद हळवासा, आयुष्य स्पर्शूनी गेला

सीतेच्या वनवासातील जणू अंगी राघव शेला...

रघुनंदनाचा वास असलेल्या त्या वस्त्राचं सीतामाईने कितीक वेळा अवघ्राण केलं असेल! तुझं येवढसं छायाचित्र केव्हापासून जपून ठेवलंय मी. अतिशय तेजस्वी असं तुझं रूप आणि "कमले कमलोत्पत्ति:" प्रमाणे भासणारे तुझे सुरेख नेत्र. येवढी आभा उधळशील तर संपून जाशील गं क्षणार्धात! किती गोष्टींची भीती बाळगायची? त्या दिवशी तू आल्याची वर्दी अचानक कोणीतरी दिली, तेव्हापासून नवा जन्मच सुरू झालाय माझा. म्हटलं ना, आठवणी मांजरीसारख्या असतात म्हणून. इतके दिवस प्रेमानं आंजरल्या-गोंजारल्यावर कसं गं ह्यांना आपल्यापासून दूर करायचं?

स्तोत्रात इंद्रिये अवघि, गुणगुणती दु:ख कुणाचे

हे सरता संपत नाही चांदणे तुझ्या स्मरणाचे...

परत भेटशील कदाचित ह्या आशेने मी जातो आजही तिथे. काळ्या मातीतून सोनंही पिकवून देणारा मत्सखा हस्ताचा पाऊस पडत असतो. शरदाची थंड संध्याकाळ असते. टपो-या शुभ्र फुलांनी सगळ्या वाटा फुललेल्या असतात, आणि त्यांच्या मंद सुगंधाने अवकाश भरलेलं असतं, अश्या एखाद्या "संध्याकाळी" मुळीच रहावत नाही बघ... देव असतो की नसतो माहीत नाही. नसतोच बहुधा. पण योगायोग स्वरूपी बापाचं आणि तुझ्या पदस्पर्शानं पुलकित झालेल्या त्याच्या देवळाचं अस्तित्च कोण नाकारणार? काळ्या संध्याकाळी सोनेरी आशेनं उजळलेल्या त्या गाभा-यापाशी पोहोचेपर्यंत माझं मन सैरभैर होवून जातं. सारी ज्योत्स्ना कृष्णमेघांमध्ये लुप्त झालेली असते, मात्र हळूच ओंजळीआड गेलेल्या माझ्या पापण्यांच्या ऐलतीरावर मात्र एकाच तारकेचा शुभ्र प्रकाश पडलेला असतो...

परत भेट नाहीच ना आपली?

भय इथले संपत नाही...